

वाशी : तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पारगाव परिसरात व तालुक्यातील आनेक गावात जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
पिकांची दयनीय अवस्था
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असताना बुधवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. इंदापूर परिसती कांदा पिकाचे नुकसान झाले आहे तसेच अनेक ठिकाणी ज्वारीची पिके काढलेली भिजल्याने कणसे काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काढणीला आलेला गहू भिजल्याने दाण्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. हरभऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घाटे सडण्याची शक्यता वाढली आहे.
शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची मागणी
आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याचे या पावसामुळे कंबरडे मोडले आहे. मळणीची कामे अंतिम टप्प्यात असताना आलेल्या या संकटामुळे मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.