

The decision to ban online gaming is welcome
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन गेमिंगच्या जीवघेण्या व्यसनामुळे तरुणाईचे आयुष्य उद्धस्त होत असल्याचे गंभीर प्रकार समोर आल्यानंतर अखेर केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्वागत केले आहे.
काही दिवसांपूर्वी खा. राजेनिंबाळकर यांनी संसदेत या विषयावर आवाज उठवला होता. या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी कायद्याचा मसुदा लोकसभेत सादर केला आहे.
यामुळे अनेक कुटुंबांचे भविष्य वाचणार आहे. खा. राजेनिंबाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे, की सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर वाढल्याने, ऑनलाइन गेमिंगचे व्यसनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 'जंगली रमी', 'ड्रीम-११', 'रमी सर्कल' यांसारख्या खेळांच्या जाहिरातींना बळी पडून अनेक तरुण लवकर श्रीमंत होण्याच्या आशेने यात अडकत आहेत. या व्यसनामुळे प्रचंड कर्जबाजारी होऊन नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत.
याचेच एक उदाहरण म्हणजे, १६ जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील बावी कावलदरा येथील तरुण लक्ष्मण जाधव याने ऑनलाईन गेमिंगमुळे झालेल्या कर्जातून नैराश्यातून आपल्या कुटुंबाला विष देऊन संपवले आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. याआधी कुडुवाडी येथेही एका तरुणाने याच व्यसनामुळे आपली ८ एकर जमीन आणि दोन ट्रॅक्टर विकल्याची घटना घडली होती.
ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या गंभीर सामाजिक प्रश्नाची दखल घेत, लोकसभेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यापूर्वी आमदार कैलास पाटील यांनीही विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ऑनलाईन जुगारांवर बंदी घालण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
हा कायदा अस्तित्वात आल्यास, तरुण वर्ग आपोआपच या व्यसनापासून दूर राहील आणि आत्महत्यांसारखी टोकाची पावले उचलणार नाहीत. यामुळे अनेक कुटुंबे उद्धस्त होण्यापासून वाचतील. असे सांगत खा. राजेनिंबाळकर यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.