धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने चार हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे. पुढील ९० दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहणार कहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकार सोयाबीनचे भाव ५००० असावा यासाठी उपाययोजना करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
शुक्रवारी धाराशिव तालुक्यातील कनगरा येथे कनगरा पाटी ते कनगरा गावांपर्यंतच्या अडीच कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व १० लाख रुपयांच्या आमदार निधीतून पूर्ण केलेल्या श्री हनुमान मंदिरा समोरील सभामंडपाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसोबत बैठक घेवून आमदार पाटील यांनी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस आहे.
त्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रता पहायला मिळत आहे त्यामुळे विचारपूर्वक १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.