

धाराशिव : राज्य सरकारच्या कर्जमाफी अध्यादेशातील जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात, या मागणीसाठी २९ जून रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आ. रोहित पवार यांनी दिला. गुरुवारी (दि. २५) ते शहरात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले, की ३० जूनपासून कर्जमाफीची अंमलबजावणी अपेक्षित असल्याने त्यापूर्वीच शासनाने निर्णयात सुधारणा करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र लढा उभारला जाईल. पत्रकार परिषदेत आ. पवार म्हणाले की, कर्जमाफी योजनेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल समाधान असले तरी लाभार्थ्यांसाठी घालण्यात आलेल्या अटी अन्यायकारक आहेत. यापूर्वीही या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शासनाने मागण्या योग्य असल्याचे मान्य केले, मात्र प्रत्यक्षात त्यानुसार निर्णय घेतला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील आणि खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोन राजकीय परिवारांच्या वर्चस्वामुळे जिल्ह्याला पर्यायी राजकारणाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचीही ‘बी टीम’ नसल्याचा पुनरुच्चार करत, भविष्यात अशा आरोपांना वाव मिळणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, रोहित बागल, अविनाश जाधव, योगेश सोनने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कै. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचाही उल्लेख केला. या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असली तरी खरे मारेकरी अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही यासाठी पुढाकार घेऊन आपल्या वडिलांच्या हत्येतील सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.