

धाराशिव : तालुक्यातील बावी, धारूर या ठिकाणी मंगळवारी गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी आ. कैलास पाटील यांनी केली. केळी, आंबा बागा, ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी गारपीटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होऊन पिकांचे नुकसान होत आहे. अशाच प्रकारे मंगळवारी झालेल्या गारपिटीमुळे धाराशिव तालुक्यातील धारूर, बावी, खामसवाडी यासह कळंब येथील देवळाली, कोल्हेगाव, ढोराळा आदी परिसरामध्ये गारपिटीने अक्षरश: शेतकऱ्याचे पीक वाया गेलेले दिसत आहे. या गावांमध्ये आ. पाटील यांनी भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शिवाय या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची सूचना केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकारने करावे अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यावेळी तहसीलदार मृणाल जाधव, तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाणे, उप अभियंता प्रकाश मोरे, शिवसेनेचे अंकुश मोरे, गजेंद्र जाधव, बालाजी गुरव, धारूरचे सरपंच बालाजी पवार यांच्यासमवेत शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.