

Farmers' Diwali in darkness; Soybean prices are very low
समाधान डोके
ईट, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठा सजल्या असल्या तरी अपेक्षित उत्साह दिसत नाही. ईट बाजारात गर्दी असूनही खरेदीचा ओघ मंदावलेला आहे. आर्थिक चढउतार, सोने-चांदीच्या वाढत्या किमती आणि अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींनी या सणाचा उत्साह फिका पडला आहे.
राज्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून, हमीभावापेक्षा क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. केंद्र सरकारने ठरविलेला सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना बाजारात प्रत्यक्ष दर केवळ ३,७०० ते ४,००० रुपये मिळत आहे. त्यात आर्द्रतेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणखीनच वाढले आहे.
अतिवृष्टीच्या तडाख्यातून काही प्रमाणात बचावलेले पिकही समाधानकारक नाही. एका एकरातून मिळणारे दोन-अडीच क्विंटल उत्पादनातून फक्त सात ते साडेसात हजार रुपये उत्पन्न मिळते, मात्र खर्च दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना एकरी ५० ते ६० टक्के तोटा सोसावा लागत आहे. शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र दिवाळी सुरू झाली तरी अनुदान अद्याप जमा झालेले नाही. प्रशासनाकडून याद्या तयार करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी या वर्षीही कर्ज, तोटा आणि प्रतीक्षेच्या सावटाखालीच साजरी होणार आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता शासनाच्या मदत व पीकविमा भरपाईकडे लागले आहेत.
दिवाळी आणि लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला आहे. केवळ एका आठवड्याच्या आत चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची (१३ टक्के) वाढ झाली आहे, तर सोन्याचे दरही ४ टक्क्याने वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर १ लाख २३ हजार रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर १ लाख ६८ हजार रुपये किलो असे झाले आहेत. मात्र सोयाबीन चे दर वाढ्णयाऐवजी कमी झाले आहेत.
गतवर्षी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये विकणारे सोयाबीन यावषी ४ हजार ने विकावे लागण्याची वेळ कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यावर आली आहे.