

रत्नापूर : गुरुवारी (ता.२६) रात्री अज्ञात हिंस्त्रप्राण्याने वासराची शिकार केल्याची घटना दहा वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांना वासराला ज्वारीच्या पिकात वासराला हिंस्त्रप्राण्याने ओढत नेल्याच्या प्रकार पहिलाच प्रकार घडला आहे. वनविभागाला या घटनेची माहिती देताच वनविभागचे गस्त पथक दाखल झाले होते. येडशी अभयारण्यात वाघाचा मुक्काम वाढणार असून शेतकऱ्यात भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून शेतकऱ्यांचे सुरक्षितता, बचाव, व्याघ्रसंरक्षण या बाबत समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येडशीच्या अभयारण्यात गेल्या तीन दिवसांपासून वनविभागने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे रोजच दर्शन होतं असून मंगळवारी बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलाव परिसरात वाघ दिसल्याची माहिती आहे. येडशी अभयारण्यालगत बालाघाटतील. वडगाव, चोराखळी, उक्कडगाव, पिंपळवाडी (ता. बार्शी) श्री.येडेश्वरी मंदिर येरमाळा परिसरात सार्वजनिक वनविभागाचे वनक्षेत्र आहे.
गुरुवारी (ता.२६) कळंब तालुक्यातील मलकापूर येथील यशवंत लोमटे यांचा मुलगा शेतात गेले असता त्यांचे गायीचे वासरु वाघसदृष्य वन्यप्राणी फरफटत घेऊन जात असल्याचे दिसताच आजूबाजूचे शेतकरी जमा होऊन आरडाओरडा केला. सदरील घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना संपर्क करुन सदरील घटनेची माहिती देताच येडशी अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी.मुंडे, वनविभाग भूम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दीपक गांधले वनरक्षक सतीश साळुंके, बालाजी ससाने, गजानन दांडगे, संकेत टाके, सागर जगताप, प्रमोद कांबळे, वनसेवक भारत काकडे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जमावाला घरी पाठवून आज सकाळी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याठिकाणी ट्रॅपकॅमेरे बसवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील चार तालुक्यात बिबटया, वाघाचा वावर असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. असे असले मानवापासून दुर्मिळ वाघाचे संरक्षण होणे गरजेचे आहे. मानवाकडून वाघाला दगा फटका होण्याची शक्यता पाहता या परिसरातील शेतकऱ्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी. मुंडे यांना दोन वेळा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही
मलकापूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करुन ठार केल्याचा पंचनामा केला आहे. पाऊस पडल्याने ठशांचे पंचनामे करण्यात अडचण आली. ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असून वासरु हल्यात मृत्युमुखी पडल्याने संबधित शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळेल.
दीपक गांधले. वनपरीक्षेत्र अधिकारी भूम.