

धाराशिव : दहावी परीक्षेच्या निकालातही धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 91.29 टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी करत बाजी मारली आहे. याही परीक्षेत जिल्हा लातूर बोर्डात दुसऱ्या स्थानावर आहे.
दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 22 हजार 38 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 21 हजार 693 जणांनी परिक्षा दिली होती. त्यातील 19 हजार 804 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल 88.30 टक्के तर मुलींचा निकाल तब्बल 94.88 टक्के लागला आहे.
तालुकानिहाय निकालात धाराशिव तालुक्याने 93.03 टक्क्यांसह आघाडी घेतली. वाशी तालुक्याचा निकाल 92.52 टक्के, परंडा 92.60 टक्के, उमरगा92.87 टक्के आणि भूम 92.56 टक्के इतका लागला. कळंब तालुक्याचा निकाल 89.18 टक्के, तुळजापूरचा 89.06 टक्के तर लोहारा तालुक्याचा निकाल 84.82 टक्के लागला.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांनी 90 टक्क्यांच्या आसपास निकालाची नोंद करत शैक्षणिक गुणवत्ता कायम राखल्याचे चित्र यंदाही अधोरेखित झाले. शहरातील तेरणा पब्लिक स्कुलचा तसेच विद्यामाता हायस्कूल या दोन शाळांचा निकाल प्रत्येकी 100 टक्के, छत्रपती हायस्कूलचा 99.70 टक्के, भोसले हायस्कूलचा निकाल 97.31 टक्के, जिल्हा परिषद मुलींची शाळा 92.80 निकाल लागला.