

मुरूम : बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थिंनीना भरधाव पिकअपने उडविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.११) मुरुमजवळ असलेल्या बेळंब येथे घडली. या अपघातात दोन विद्यार्थिंनीसह एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
उमरगा तालुक्यातील श्रमजीवी अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुकन्या सुग्रीव कांबळे (वय १९) आणि अनुसया सुग्रीव कांबळे (वय १८) या दोघी बहिणी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बेळंब पाटीवर कर्नाटक बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यांच्यासोबतच कोथळी येथील धोंडिराम महादेव चौगुले (वय ४८) हेही बसची वाट पाहत थांबले होते. त्यांच्यासह आणखी दोघेजण त्या ठिकाणी थांबले होते. यादरम्यान आलूर येथून भरधाव वेगात आलेल्या पिकअप (MH ४२ AQ ६२०४) या पिकअपने पाच जणांना उडविले. यात सुकन्या कांबळे , अनुसया कांबळे व धोंडिराम महादेव गुरव हे तिघे गंभीर जखमी झाले तर सूर्यकांत पाटील (वय २३) व गोपाळ बालाजी बिराजदार (वय २१) हे दोघे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या तिघांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.