

कळंबः कळंब नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील मतदार यादीतील बोगस नावे पद्धतशीरपणे विशिष्ट यंत्रणेमार्फत समाविष्ट केली असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून थेट प्रशासनावरच निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. “एका विशिष्ट राजकीय पक्षाला जिंकवण्यासाठी बाह्य आणि बनावट मतदारांची पद्धतशीर नोंदणी करण्यात आली आहे, असा गंभीर दावा करत त्यांनी संपूर्ण यंत्रणेच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुंदडा यांनी सांगितले की, नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये 2000 हून अधिक मतदारांची नावे बदलून इतर प्रभागात टाकण्यात आली आहेत. हे नेमके कोणाच्या दबावाखाली करण्यात आले? प्रशासन लोकशाहीची थट्टा करत आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मतदार याद्या तयार करताना निवडणूक आयोगाच्या नावाखाली मनमानी सुरू असून, प्रशासन विशिष्ट ‘यंत्रणे’च्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा थेट आरोप मुंदडा यांनी केला. यावेळी नंदकिशोर हौसलमल, गोविंद चौधरी, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.
हरकतींवर दुर्लक्ष, नियमांची पायमल्ली
मतदार याद्यांवर हरकती व आक्षेप नोंदवण्यासाठी खलम सहा अंतर्गत दोन नियम आहेत 1) स्वतः मतदाराचा अर्ज 2) इतरांनी केलेला आक्षेप. पण मुख्याधिकारी मंजुषा गुरमे आणि निवडणूक विभागातील काकडे यांनी दुसरा नियम पायदळी तुडवत स्वतः या आणि हरकती नोंदवा असा अजब नियम राबवला असल्याची टीका मुंदडा यांनी केली.
बोगस नावे काढली नाहीत तर थेट न्यायालयात..
मुंदडा म्हणाले, जर बोगस नावे आणि फेरफार केलेले मतदार तातडीने वगळले नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.