

भूम : तालुक्यातील उळूप येथील खर्डा-जामखेड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२७) दुपारी चारच्या सुमारास घडली. गणेश गौतम वारे (वय ४०, रा. बऱ्हाणपूर, ता. भूम) असे अपघातातील मृताचे नाव आहे. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यात दगड टाकून दीड तास रास्ता रोको केला.
याबाबत अधिक माहिती अशी, भूमहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात गणेश वारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ सौरभ शेषेराव वारे (वय २२, रा. बऱ्हाणपूर, ता. भूम) हा गंभीर जखमी झाला. अपघात करणाऱ्या दुचाकीवरील कल्याण सुभाष काळे (वय १८, रा. गोरमाळा फाटा) व रामा अशोक काळे (वय १७, रा. ईडा, अंतरगाव) हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी रस्त्यावर दगड टाकून रास्ता रोको केला. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढत रास्ता रोको हटवला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.