

तुळजापूर : तुळजापूर शहरात तरुणांवरील रक्तरंजित हल्ले थांबत नसून, शनिवारी (22 मे) पुन्हा शुक्रवार पेठ भागातील (बोंबले चौकात) दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केला असून, त्याच्यासोबत चुलत भावालाही जबर मारहाण करण्यात आली आहे.
मयूर बाळासाहेब पेंदे (वय 35, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 22 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते आणि चुलत भाऊ पंकज विठ्ठल पेंदे हे कारने जेवणासाठी धाराशिव रोडकडे जात होते. बोंबले चौक येथे हर्ष बालाजी सोंजी यांनी मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध उभी केल्याने त्यांनी हॉर्न वाजवून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून आरोपी संतापला. ‘रस्ता तुझ्या बापाचा आहे का?’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कारवर बुक्क्यांनी मारहाण केली.
मयूर पेंदे हे गाडीतून खाली उतरून समजाविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने खिशातील चाकूने मयूर पेंदे यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. तसेच कान व गालावरही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. मयूर यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या पंकज पेंदे यांच्यावरही आरोपीने छाती व हातावर वार करून जखमी केले.