

Announce FRP; Soybean procurement is required immediately
अणदूर, पुढारी वृत्तसेवा : सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याबरोबरच उसाला पहिली उचल ३४०० रुपये द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) सकाळी शेतकऱ्यांच्या मागण्यासंबंधी व वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. परिषदेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी हालगांच्या कडकडातात शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, की जर शेतकऱ्यांना त्रास दिला किंवा थकीत बिले ताबडतोब दिले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल. उसाला ३४०० रुपये पहिली उचल दिली पाहिजे. सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करावे. मागील हंगामातील एफआरपी तात्काळ जमा करावी. एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यावर एफआरआय दाखल करावा. अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मध्ये वाढ करून प्रति हेक्टरी ५० हजार त्वरित द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. यावेळी रविंद्र इंगळे, शहाजी सोमवंशी, विजय रणदिवे आधी मान्यवरांची भाषणे झाली.
आयोजक शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, मोसिन पटेल, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुका अध्यक्ष दुर्वास भोजनेमकबूल मुल्ला, गोकुळ शिंदे, युबराज नवाडे, राजाराम सुरवसे इत्यादी स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस परिषद होणार खूप मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी तुळजापूर, उमरगा व अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व कारखानदारांनी मागील हंगामातील थकीत ऊस बिले तात्काळ अदा करा, सर्व कारखानदाराने चालू हंगामातील एफआरपी जाहीर करा. सरसकट संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकचे भरीव अनुदान मंजूर करावे. सोयाबीनची शासकीय खरेदी लवकरात लवकर सुरू करावी.