गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : रविवारी (दि.२०) गंगाखेड येथील बंजारा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना परभणीचे खासदार संजय जाधव बोलत होते. दरम्यान त्यांनी नागरिकांना कोणासमोर विकासनिधीसाठी झुकावे लागणार नाही अशी माहिती दिली.
गंगाखेड येथे रविवारी (दि. २०) माजी आमदार सिताराम घनदाट यांच्या संपर्क कार्यालयावर बंजारा समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या मेळावाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट हे तर मुख्य अतिथी म्हणून खासदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, अभ्युदय बँकेचे संचालक माधवराव थावरे, माजी सदस्य सदाशिवराव ढेले आदींची यावेळी उपस्थिती होती.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तांडे-वस्ती मध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोणासमोर विकासनिधीसाठी झुकावे लागणार नाही. मी आत्मसन्मानाने मतदार संघातील ११ तांडेवस्तीना भरघोस विकासनिधी देऊन विकासाच्या प्रवाहात आणण्याचे यावेळी अभिवचन देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी आपल्या आक्रमक भाषणात खा. संजय जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे व जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. जिल्हा नियोजन समितीच्या विकासनिधीबाबत माहिती देत असताना जाधव यांनी सावंत यांच्यावर आरोप केले. विकासनिधी वाटपात भेदभाव करून केवळ सत्ताधारी आमदारांना विकासनिधी देत विरोधक आमदारांच्या मतदारसंघात एकही रुपये न देण्याचे पाप पालकमंत्र्यांनी केले आहे. केवळ टक्केवारीसाठी पालकमंत्री डॉ. सावंत हे जिल्ह्यात येतात असे आरोप खासदार जाधव यांनी केले.