

Water immersion protest in Lavki river near village demanding road in Anandwadi
वाळूज, पुढारी वृत्तसेवा: आनंदवाडी येथे रस्त्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.१६) गावाजवळील लवकी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल आठ तास सुरू राहिले. नायब तहसीलदार सचीन वाघमारे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले. स्थानिक प्रशासनाचा धिक्कार असो, आमचा रस्ता झालाच पाहिजे, आश्वासनाचे गाजर कुठपर्यंत दाखवत आहात, अशा घोषणांनी आनंदवाडीकरांनी परिसर दणाणून सोडला.
आनंदवाडीकरांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याने कठीणवाडी म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ जुनी झांजडी ते आनंदवाडी या २ कि. मी. रस्त्यासाठी शासनदरबारी हेलपाटे मारूनही पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे अखेर आनंदवाडीकरांनी गुरुवारी सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला. या अनुषंगाने गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वागवाड यांना पत्र देऊन १६ ऑक्टोबरला आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी कळविले होते. मात्र तरीही निगरगट्ठ प्रशासनाने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी जवळपास १०० नागरिकांनी रस्त्यात असलेल्या खोल पाण्यात सकाळी १० वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शालेय विद्याथीही सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या काही घोषणा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले फलक व दिलेल्या देवाभाऊ आम्हाला - दिवाळीपूर्वी रस्ता भेट देणार का, राजकीय नेत्यासह अधिकारीही आमच्याशी खोटे बोलतात,
पोलिस मामा आम्हाला तुमच्यासारखे पोलिस व्हायचे आदी. घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. आनंदवाडीत इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. मात्र रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे कठीण झाले आहे. नागरिकांनाही मोठी अडचण होत असून, दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, सायंकाळी तहसीलदार नवनाथ वागवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी बोलणी केली. मात्र तोडगा निघाला नाही. अखेर नायब तहसीलदार सचीन वाघमारे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले.
तीन वषर्षांपूवी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेलेल आश्वासनही हवेत विरले असल्याचे सांगून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक रामेश्वर गावंडे यांनी सांगितले. या आंदोलनात योगेश गावंडे, भाऊ काजळे, गोपीनाथ गावंडे, राहुल काजळे, प्रणव गावंडे, गणेश काजळे, देवधर गावंडे, शंकर निकम, हरिभाऊ काजळे, सोमीनाथ गावंडे, अशोक निकम, गणेश गावंडे, दादासाहेब राठोड, किरण राठोड, दादासाहेब रानमाळ, सचिन पारुंडे, शिलाबाई गावंडे यांच्यासह शालेय विद्याथी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.