

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील वाळूज औद्योगिक क्षेत्रालगतच्या अ-नागरी झोनमधील जमिनींच्या वापर बदलासंदर्भात निर्णय राज्य शासनाने महत्त्वाचा घेतला आहे. बारा गावांच्या परिसरातील जमिनी नागरी झोनमध्ये रूपांतरित करण्यात येणार असून त्यासाठी अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यासोबतच या गावांमधील गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी बेटरमेंट चार्जेसमध्ये अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाने २४ एप्रिल रोजी यासंदर्भातील निर्णय जारी केला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रात लघुद्योगांसाठी जागेची कमतरता असल्याने अनेक उद्योजकांनी औद्योगिक व निवासी वापरासाठी लगतच्या गट क्रमांकांमध्ये कारखाने व इतर बांधकामे उभारली आहेत. मात्र या भागात नियोजनबद्ध सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक व उद्योजकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार स्थलांतरित झाल्याने या भागात गुंठेवारी स्वरूपाचाही अनधिकृत विकास झाला आहे.
या पार्श्वभूमीवर कमलापूर, जोगेश्वरी, रामराई, घारेगाव, इटाबा, वाळूज खुर्द, वाळूज बु., राजनगाव शेपुंजी, सहजापूर, तिसगाव, वडगाव कोल्हाटी आणि नायगाव या १२ गावांतील संबंधित जमिनींच्या वापर बदलाबाबत समिती अहवाल देणार आहे. समितीने प्रत्येक जागेची सद्यस्थिती तपासून १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करायचा आहे.
तसेच या भागातील मालमत्तांच्या गुंठेवारी विकास नियमितीकरणासाठी बेटरमेंट चार्जेसमध्ये अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. १ मे ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत देय शुल्काच्या १० टक्के, तर १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५० टक्के शुल्क आकारले जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून पूर्ण शुल्क आकारण्यात येणार आहे.