

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील विरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांनी नियमांना हरताळ फासून मनमानी पद्धतीने प्रभाग निश्चित केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, लोकसंख्या आणि घर क्रमांकाच्या आधारे रचना न करता अनुसूचित जाती-जमातींची आकडेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. विशिष्ट भागांना सोयीनुसार राखीव वॉर्ड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. ही चुकीची वार्ड रचना रद्द करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा काशिनाथ बारसे, विलास थोरात, नानासाहेब थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.