

The cold weather is gone; maximum and minimum temperatures have increased
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांत वाढलेला थंडीचा जोर ओसरला असून, कमाल, किमान तापमानात वाढ झाली आहे. दिवसागणिक उष्ण तेची तीव्रता वाढत असून, पहाटेचा गारवा कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक भासत आहे. कमाल व किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे यंदाची गुलाबी थंडी लवकरच निरोप घेत असल्याचे जाणवत आहे.
जानेवारीअखेरपासून शहर व जिल्ह्यात थंडीचा कडाका झपाट्याने ओसरत चालला असून, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान, तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
तसेच वाऱ्याचा वेग ताशी ३ ते १३ किलोमीटर इतका असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत सकाळी व संध्याकाळी जाणवणारी थंडी कमी झाली असून, उबदार वातावरणामुळे नागरिकांनी हलक्या कपड्यांकडे मोर्चा वळवला आहे. वाढत्या तापमानाचा पारा वाढला असून, कोरडे हवामान रब्बी पिकांसाठी काही प्रमाणात पोषक ठरत आहे.
दरम्यान १ ते ७फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असून, आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित कमी, तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचे दिवस संपत चालले असून, उन्हाळ्याची चाहूल जाणवत आहे.