

सिल्लोड : तालुक्यात मंगळवारी (दि. २३) दुपारी काही भागात दमदार पाऊस झाला, तर काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. भराडी परिसर पावसाने अक्षरशः झोडपून काढला.कासोद- तळणी रस्त्यामधील नाल्याचे पाणी पुलावरून पाणी वाहिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तर उकाडा चांगलाच वाढला होता. रात्री आकाशात विजा चमकत होत्या. परंतु पाऊस हजेरी लावत नव्हता. मंगळवारी दुपारी मात्र तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. भराडी, कासोद, देऊळगाव बाजार, धानोरा, वांजोळा, वांगी, वडोदचाथा, बोरगाव बाजार परिसरात चांगला पाऊस झाला. तर सिल्लोड शहरासह पळशी, केऱ्हाळा, भवन, मंगरुळ, पालोद, अन्वी, दीडगाव, डोंगरगाव, उपळी परिसरात मध्यम पाऊस झाला.
कासोद- तळणी रस्त्यामधील नाल्याचे पाणी पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. तर तळणी- शिंदेफळ रस्त्यावरील पुलावरुन देखील पाणी वाहिल्याने वाहन चालकांना तारांबळ उडाली. कोटनांद्राजवळील नदीला पाणी आले. तर भराडी, कासोद, धानोरा, वांजोळा शिवारात शेतांना तलावाचे स्वरुप आले होते.
मान्सूनपूर्व पावसामुळे लागवड केलेली मिरची, कापूस, आद्रक पिकाला फायदा होणार असून अजूनही निम्या तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. दरम्यान, पावसाला चांगील सुरुवात झाल्याने शेतकरी आता शेती कामांत व्यस्त झाले आहेत. पेरणीसाठी काही जण एखाद्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
अधिक मासामुळे एक महिना लग्न तिथी नव्हत्या. अधिक मास संपताच जून महिन्यात काही लग्न समारंभ ठरलेले होते. मंगळवारी मुहुर्त असल्याने तालुक्यात अनेक गावांमध्ये लग्न समारंभ होते. मात्र दुपारीच पाऊस सुरु झाल्याने वऱ्हाडी मंडळींची तारांबळा उडाली. गेल्या वर्षी एप्रिल- मे महिन्यातील अवकाळी पाऊस लग्नात विघ्न ठरला होता.