

Sillod BJP's Suresh Bankar gets strength
राजू वैष्णव
सिल्लोड : येथील पंचायत समितीत भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता यांना बनकर संधी देत पक्षाने एका प्रकारे सुरेश बनकर यांना बळ दिले आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असले तरी पंचायत समितीत मात्र भाजपने वर्चस्व राखत आ. अब्दुल सत्तारांना धक्का दिला आहे.
पंचायत समितीशी ग्रामीण भागातील विकासाच्या योजनांची नाळ जोडलेली गेलेली असल्याने या संस्थेतील सत्तेला राजकारणात मोठे महत्त्व आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सुरेश बनकर यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत भाजपने १८ पैकी १० सदस्य निवडून आणत शिवसेनेला धोबीपछाड देत वर्चस्व राखले.
तर भाजपने सभापतीपदी अनिता बनकर यांना संधी देत सुरेश बनकर यांना बळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शांत, संयमी, सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून सुरेश बनकर यांची सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात ओळख आहे.
२००९, २०१४ अशा दोन विधानसभा निवडणुका बनकर यांनी भाजपकडून लढल्या. यात त्यांचा पराभव झाला. तर २०२४ मध्ये त्यांनी हातात मशाल घेतली होती. यातही त्यांचा निसटता पराभव झाला. तर निवडणुकीनंतर बनकर पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले व नव्या उमदीने मतदारसंघात पक्षाच्या कामाला लागले. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सुरेश बनकर यांचा दांडगा जनसंपर्क असून, त्यांना मानण-ारा मोठा वर्ग आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला निसटता पराभव सर्वसामान्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. तर त्यांचा पराभव होऊनही जनतेच्या मनातील आमदार, अशी नवी ओळख तरुण मतदारांनी सुरेश बनकर यांना दिलेली असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय सत्तांतर
सिल्लोड, सोयगाव पंचायत समितीत आ. अब्दुल सत्तारांचा दबदबा असला तरी यंदा तो कमी झाल्याचे निकालावरून दिसते, असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. एकेकाळी (काँग्रेसमध्ये असताना) आ. अब्दुल सत्तारांचे छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात एकहाती वर्चस्व होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका आ. सत्तारांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात होत्या. मात्र २०१९ मध्ये आ. सत्तार शिवसेनेत गेले व दबदब्याला ओहटी लागली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ. सत्तार काठावर पास झाले. तर आता मतदारसंघातील दोन्ही पंचायत समितीतील सत्ता हातातून गेल्याने दबदबा काहीसा ओसरला असून, हे राजकीय सत्तांतर आ. अब्दुल सत्तारांसाठी धक्का मानला जात असल्याचे राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे..