

Shri Sant Eknath Maharaj Palkhi Ceremony on its way for the return journey
पैठण, पुढारी वृत्तसेवा :
जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता
तुझ्या नादाने पाहिले मी हि तुझीच रे पंढरी
पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यात सालाबादाप्रमाणे सहभाग घेऊन श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.२९) विठ्ठल मंदिरात काल्याचा सोहळा पूर्ण करून परतीच्या वारी प्रवासासाठी पंढरीनगरीतून पांडुरंगाचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त ४२७ वर्षांची परंपरा कायम ठेवून ७ जुलै रोजी पैठणनगरीतून श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारो वारकऱ्यांच्या सहभागातून प्रस्थान झाला होता. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव या चार जिल्ह्यांतून विविध गावांच्या पालखी मार्गावरील १७ पंचक्रोशीत मुक्काम करून आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला सोहळा २४ जुलै रोजी पंढरीच्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी झाला होता.
पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज गोसावी, अॅड. योगेश महाराज गोसावी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पंढरपूर येथील नाथ चौकातील नाथ मंदिरात तीन दिवस हरिनामाचा गजर करून भानुदास एकनाथ जयघोषात सोहळ्यातील वारकरी महाराज मंडळी यांनी टाळ-मृदंगांच्या तालावर कीर्तन व भजन सेवा मोठ्या उत्साहात केली.
यावेळी पालखी सोहळ्याच्या वतीने विठ्ठल मंदिरात मंगळवारी (दि.२८) संत भानुदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला. बुधवारी (दि.२९) सोहळ्यातील सर्व मानकरी, टाळकरी, वारकरी, सेवेकरी, महाराज मंडळी यांनी पांडुरंगाचे चरणी नतमस्तक होऊन पंढरीचा निरोप घेत परतीच्या वारीसाठी सोहळा मेंढापूर, बार्डीमार्गे मार्गस्थ झाला. निमगाव (टे), साडे, देविचामाळ, हाळगाव, जामखेड, डोंगरकिन्ही, गोमळवाडे, टेंभुर्णी, येळी, शिंगोरी, घारी आदी ११ गावांच्या पंचक्रोशीत मुक्काम करून सोहळा रविवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पैठणनगरीत दाखल होणार आहे.
या सोहळ्यात तळपे महाराज, गंगाराम महाराज राऊत, रखमाजी महाराज नवले, बबन महाराज बोरकर, लोखंडे महाराज, भानुदास महाराज, उगले महाराज, खैरमोडे महाराज, केदारनाथ महाराज, ऋषी महाराज नवले, रवींद्र पांडव, सचिन पांडव, रवी महाराज कुलकर्णी, महेश भवर, संजय ढोबळे, एकनाथ साठे, पांडुरंग सूर्यवंशी सेवेकरीसह विविध महाराज मंडळी यांनी सहभाग घेतला आहे. नाथांच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढून पंढरीदर्शन करून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी भाविकांच्या वतीने केली जात आहे.