![Sandipan Bhumre News](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fc33b7398-7700-4726-8026-7d6af1140c2f%2F2222.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तरीदेखील आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे भुमरे यांनी बुधवारी (दि.२६) स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यावरच राजीनामा देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
भुमरे खासदार झाल्यामुळे राज्यातील एक मंत्रीपद रिक्त होऊन त्याठिकाणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची वर्णी लागेल, असे बोलले जात होते. परंतु आता मंत्रीपद न सोडण्याच्या भुमरे यांच्या भुमिकेमुळे दोन वर्षांपासून मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या आमदार संजय शिरसाट यांना मंत्रीपदापासून वंचितच राहावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी इच्छूक असलेले मंत्री अब्दूल सत्तार यांनाही हा झटका मानला जात आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संदीपान भुमरे आणि अब्दूल सत्तार या दोघांना मंत्रीपद मिळाले. एका जिल्ह्यातून दोघांना मंत्रीपद दिले गेल्याने प्रमुख दावेदार असूनही त्यावेळी संजय शिरसाट यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत भुमरे विजयी झाल्याने ते राजीनामा देतील आणि त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर शिरसाट यांची वर्णी लागेल, असे समजले जात होते. खासदार झाल्यावर भुमरे यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु मंत्रीपदावर कायम राहणार असल्याचे सांगत आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यावर राजीनामा देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे तुर्तास तरी भुमरे हे केंद्रात खासदार आणि राज्यात मंत्रीही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही लोकप्रतिनिधीला एकाचवेळी आमदार आणि खासदार अशा दोन्ही पदांवर कायम राहता येत नाही. त्यानुसार खासदार झाल्यावर भुमरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु मंत्रीपदाबाबत तसा नियम नाही.