

Sambhajinagar News: Elect the BJP candidates for the development of the city Minister Atul Save
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा संपूर्ण शहराला येत्या एक महिन्याच्या आत दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. त्यासोबतच प्रभागांसह शहराचा चेहरामोहरा बदलण्यात येईल, असा ठाम विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. गुरुवारी (दि.८) प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल मकरिये, समीर राजूरकर, कीर्ती शिंदे व सीमा साळवे यांच्या प्रचारार्थ साईबाबा मंदिर, खडकेश्वर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार भागवत कराड, हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, राधाकिसन बनिया, सागर विसपुते, मुकेश जाधव, सिद्धार्थ साळवे, सचिन टिळक, दीपक पवार, मोहन कप्पा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. बैठकीत बोलताना मंत्री सावे म्हणाले की, परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील.
विशेषतः पाणीपुरवठ्याचा प्रश्न येत्या महिन्याभरात मार्गी लागेल. तसेच परिसरातील वाईन शॉपमुळे नागरिकांना होत असलेला त्रास तीन महिन्यांतच कायमस्वरूपी दूर करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्र व राज्य सरकारच्या लोकहिताच्या योजना घराघरांत पोहोचवायच्या असतील आणि छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर येणाऱ्या १५ तारखेला कमळासमोरील बटण दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी नागरिकांना केले.