

Sambhajinagar Haribhau Bagade Sahastra Chandra Darshan Program
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संतांचे आशीर्वाद, जनसामान्यांचा विश्वास हाच माझ्या आयुष्याचा खरा ठेवा आहे. सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संघर्षावर मात करण्याची खरी शिदोरी म्हणजे समाजाचा विश्वास, असे उद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामूकाका शेळके आणि सहकाऱ्यांनी राज्यपाल बागडे यांच्या ८१ वयात पदार्पणानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे रविवारी (दि.१७) एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला रामगिरी महाराज, रामराव महाराज ढोक, संदीपान महाराज शिंदे, संजय महाराज पाचपोर, बाभुळगावकर शास्त्री, पंढरीनाथ महाराज, चावरे नाना, बाळकृष्ण महाराज गिरगावकर, नागराज बाबा, सुदर्शन महाराज कपाटे, नवले महाराज, काळे महाराज, भाजप अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष तुषार भोसले, प्रिया शरण महाराज, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. संजय केणेकर, आ. अब्दुल सत्तार, उद्योजक विवेक देशपांडे यांच्यासह संत-महंत, वारकरी आणि सर्व क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यासह हजारो नागरिक उपस्थित होते. वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यपालांचा सत्कार करताना त्यांना त्यांच्या जीवनातील साधेपणा, तत्त्वनिष्ठा व सेवाभावाचे स्मरण करून दिले.
यावेळी राज्यपाल बागडे म्हणाले, मी कोणाचेही वाईट केले नाही. त्यामुळे माझेही कधी वाईट झाले नाही. बालपणापासून समोरच्याला सहकार्याची वृत्ती ठेवली. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असताना एक एक पायरी पुढे चढत गेलो. या काळात जो येईल त्याला मदतच केली. यामुळेच आज या संत-महात्म्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे. या आशीर्वादाची शिदोरी मला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल. मिळालेल्या संधीचे सोने केले. दरम्यान, पुरवठा मंत्री असताना मी ज्या प्रकरणात सुनावणी घ्यायचो त्याचा निकाल जागेवरच देत असे.
रोजगार हमी मंत्री असताना या योजनेतून सुमारे ६०० पाझर तलाव व अनेक रस्ते तयार करवून घेतल्याचेही बागडे यांनी सांगितले. यावेळी त्यांचे वैदिक मंत्रोच्चारांच्या जयघोषात सप्तचिरंजीव पूजन करण्यात आले. संत महात्म्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. त्यानंतर त्यांची नाणेतुला करण्यात आली. तसेच १० सुवासीनींच्या हस्ते ८१ दिव्यांनी बागडे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी दिव्यांच्या मंद प्रकाशात मंच उजळून निघाला होता. त्यानंतर संत-महंतांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. कराड, आ. केणेकर, आ. कुचे, तसेच संत-महंतांनी बागडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यांनी संत-महंतांचे ऋण व्यक्त केले. त्यांच्या आशीर्वादामुळे पुढील आयुष्य आणखी सुखकर होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी लहानपणापासून राजकारणातील घटनांचा उहापोह केला. आपण राज्यपाल कसे झालो हेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. मै आपको महाराष्ट्र से बाहर ले जा रहा हू, किसी को बताना नही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान त्याच रात्री २ वाजता रामूकाका शेळके आणि मंदार वाहेगावकर माझ्या घरी आले. त्यामुळे घरच्यांनी मला झोपेतून उठवले आणि मला राजस्थानचे राज्यपाल बनवल्याची माहिती दिली. मला वाटते मी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे बागडे यांनी बोलून दाखवले.
तुषार भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितले, ज्यांनी कायमच सदाचाराचे मूल्य अंगिकारले, अशा राजकारणातील संताचा तर ज्या व्यक्तीच्या कारकीर्दीला कोणताही डाग लागला नाही, असा हा अलांछन चंद्रदर्शन सो-हळा असल्याचे भोसले म्हणाले. तसेच नाना हे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. आजच्या पिढीतील नवख्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घ्यायला हवी. बागडेंचे जीवन म्हणजे संयम, शिस्त आणि सेवाभावाचा आदर्श आहे. साधे-पणा आणि पारदर्शकता ही बागडेंच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही. त्यांच्या कार्यकाळात सामान्य माणसाला प्राधान्य मिळाले असल्याचे भोसले यावेळी म्हणाले.