

Saints perform the task of alerting society Mahant Ramgiri Maharaj
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: अन्यायाविरोधात समाजाने उभे राहावे, हे सांगण्याचे काम संत करतात, असे प्रतिपादन सरला बेटचे महंत हभप रामगिरी महाराज यांनी केले.
सावखेडा येथे शनिवारी (दि.२८) सायंकाळी आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी कैलासगिरीजी महाराज, नारायण नंदगिरीजी महाराज, राष्ट्रीय धर्माचार्य डॉ. जनार्दन मेटे महाराज, अखिल भारतीय समरसता मंडळाचे सदस्य डॉ. प्रसन्ना पाटील तसेच मराठवाडा हिंदू जनजागृती संघटनेच्या प्रियांका लोणे यांची उपस्थिती होती.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, हिंदू समाजाने जाती-पाती व पक्षीय भेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अन्नछत्र सुरू केले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर धर्मात आलेली मरगळ दूर करून धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपण सहिष्णू आहोत; पण अन्याय सहन करणारे नाही.
अन्याय झाला तर त्याविरोधात उभे राहणे हेच शास्त्र शिकवते, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सक्षम व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. अन्याय सहन केल्यास अन्याय करणाऱ्यांचे मनोबल वाढते, असे सांगत समाजाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सोमनाथ महाराज बोरुडे, कृष्णा महाराज निकम, महेश महाराज सुकासे, संदीप महाराज चणघटे, संदीप महाराज खंडागळे, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, रामभाऊ महाराज, गणेश महाराज कारभार यांच्यसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा महाराज मुळे यांनी केले, तर प्रास्ताविक बळीराम मुळे यांनी केले.
गोहत्याप्रकरणी कारवाईची मागणी
संमेलनात काही वक्त्यांनी गोहत्या प्रकरणांवरून राज्यातील काही भागातील पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला. काही घटनांमध्ये तक्रारीनंतर योग्य कारवाई होत नसल्याचे कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.