

Rain accompanied by stormy winds across the district causes extensive crop damage.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, पैठणसह इतर तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारांसह झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान सिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यातील अंभई, आमठाणा, निल्लोड, पिंपळगाव पेठ आदी परिसरात सोमवारी (दि. ३०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले आणि काही क्षणांतच वातावरणाने पावसाचे रूप धारण केले. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली, तर शेतकऱ्यांवर मात्र अक्षरशः संकटाचा डोंगर कोसळला.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. आधीच हवामानाच्या लहरी पणाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर या अवकाळीने वज्रघात केला. अवघ्या दहा दिवसांपूर्वीही आमठाणा परिसरात गारपीट झाली होती; त्याचे पंचनामे पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा निसर्गान घाला घातल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
सध्या परिसरात गहू सोंगणीला सुरुवात झाली होती, तर मका काढणीच्या टप्प्यात होता. हरभरा काढणीचे काम सुरू होते. हंगामी मिरची तसेच रोपवाटिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली असून, आंब्यासह फळबागांचेही मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या बदलत्या हवामानामुळे विविध रोगराई व आजारांना निमंत्रण मिळण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पंचनाम्याची मागणी
हवामानाच्या या अनिश्चित लहरीपणामुळे आभाळ कोसळते की काय, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष नुकसान भरपाई द्यावी, अशी तीव्र मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.