वैजापूर : पुढारी वृत्तसेवा
सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. वैजापूर शहरात देखील आदिवासी बांधवांनी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये तालुक्यातील विविध गावातून आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत.
या मोर्चाला ठक्कर बाजार परिसरातून सुरुवात झाली. वैजापूर उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये तसेच इतर पाच मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने आदीवासी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तसेच आमच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे असे सकल आदिवासी समाजाच्यावतीने सांगण्यात आले.