

Police crack down on sand mafia; a staggering 238 cases registered in eight months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी, वाहतूक आणि साठेबाजीला ग्रामीण पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. गेल्या आठ महिन्यांत वाळूमाफियांविरुद्ध धडक मोहीम राबवत तब्बल २३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये ३० कोटी २७ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्यांची वाहने आणि चालकांचे परवाने थेट निलंबित करण्याची कारवाई जिल्ह्यात प्रथमच करण्यात आली आहे.
या साखळीवरच घाव घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी केवळ रस्त्यावरील वाहतुकीवर कारवाई न करता, प्रथमच मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेल्या अवैध वाळूच्या साठ्यांवर लक्ष केंद्रित केले. नाकाबंदी आणि छापेमारी करत वाळू वाहतुकीच्या रॅकेटवर प्रहार केला.
यंदा जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात वाळू तस्करी प्रकरणी २३८ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान वाळू व वाहनांसह एकूण ३० कोटी ९७ लाख ०५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा कारवाईची व्याप्ती लक्षणीय वाढली आहे.
गेल्या वर्षी याच काळात ८३ कारवाया होऊन १० कोटी ७१ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला होता. यंदा कारवायांमध्ये तब्बल २८६.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, पोलिसांनी यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर थेट निलंबनाची कारवाई केली. ५३ वाहनांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवून त्यापैकी २९ वाहने निलंबित करण्यात आली. तर, ७५ पैकी तब्बल ६३ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, १८९ आरोपींकडून प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.
सराईतांवर लागणार एमपीडीए
अवैध वाळू उत्खनन, साठवणूक, वाहतूक करणारी किंवा या बेकायदा व्यवसायासाठी वाहने उपलब्ध करून देणारी व्यक्ती अथवा टोळीची गय केली जाणार नाही. वारंवार वाळू तस्करीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींवर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामीण पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला आहे-