

पैठण:- मराठवाड्यातील औद्योगिक नगरीसह शेती सिंचनासाठी वरदान असलेल्या पैठण येथील जायकवाडी धरणावरील विद्युत पुरवठा वीज बिल वसूल करण्यासाठी पैठण महावितरण विभागाने वीज पुरवठा खंडित केल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची बातमी गुरुवारी दि.२५ रोजी दैनिक पुढारी अंकामध्ये प्रकाशित होताच झोपलेले महावितरण विभाग खडबडून जागी होऊन गुरुवारी रोजी दुपारी धरणाचा विद्युत पुरवठा जोडून विज सुरळीत करून देण्यात आली .
या चालू मार्च महिन्यामध्ये शासकीय व निम शासकीय विभागात मार्च अखेरच्या कामाची लगबग चालू असून या काळात औद्योगिक नगरी सह शेती सिंचनासाठी वरदान ठरलेल्या व सध्या दोन्ही कॅनल मधून शेतकऱ्यांसाठी पाण्याची पाळी सुरू असताना जायकवाडी धरण परिसरातील पैठण येथील महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे वीज बिल वसुलीसाठी धरणाचा वीज पुरवठा खंडित केला होता. यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकासह या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पातळीवरून महावितरण विभागाचे कान उघडणी केल्यामुळे गुरुवारी रोजी या धरणाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पैठण शहरातील महावितरण विभागाच्या अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अनेक नगरसेवकासह महावितरण ग्राहक ऊर्जामंत्री यांच्याकडे तक्रार निवेदन देणार आहे.