

Only 33.32% usable water storage in major dams of Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम धरणांतील जलसाठ्यावरही दिसून येत आहे. विभागातील ११ प्रमुख प्रकल्पांमध्ये रविवारी (दि.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ ३३.३२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२.२८ टक्के होता. त्यामुळे यंदा जलसाठ्यात सुमारे नऊ टक्क्यांची घट झाली आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालानुसार, विभागातील ११ प्रमुख धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ५,१५६ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी सध्या १,७१८ दशलक्ष घनमीटर (६०.५९ टीएमसी) इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ६०९ दशलक्ष घनमीटर (२१.५२ टीएमसी) म्हणजे २८.०७ टक्के, तर उपयुक्त साठा २१.५२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४०.९८ टक्के जलसाठा होता.
येलदरी धरणात सर्वाधिक ५१.४६ टक्के, पेनगंगा धरणात ४३.४७ टक्के, मांजरा धरणात १९.२५ टक्के, माजलगावमध्ये १९.३९ टक्के, तर निम्न दुधना धरणात २५.१८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
दुसरीकडे सिद्धेश्वर धरण पूर्णपणे रिकामे असून त्यामध्ये उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. यंदा जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित आवक झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात जुलै महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या नियोजनासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.