छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील मनुष्यबळाची कमतरता दिवसेंदिवस गंभीर होत असून, मंजूर ५ हजार २०४ पदांपैकी तब्बल २ हजार २७३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक विभागांचा कारभार अतिरिक्त पदभारावर सुरू असून, सेवानिवृत्तीमुळे ही तूट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.६) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनातील मनुष्यबळाच्या कमतरतेवर चिंता व्यक्त करण्यात आली.
महापालिकेत सध्या केवळ २ हजार ९३३ कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे अनेक अधिकारी एकाचवेळी दोन ते तीन विभागांचा अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत. त्यातच दरमहा २० ते २५ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कामकाजावर वाढता ताण येत आहे.
दरम्यान, सोमवारी स्थायी समितीची बैठक सभापती अनिल मकरीये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अभियांत्रिकी विभागातील परिस्थितीही चिंताजनक असल्याचे समोर आले यात कार्यकारी अभियंत्यांची सहा मंजूर पदे असताना सध्या केवळ तीन अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी अतिरिक्त शहर अभियंता तथा कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे महिनाभरात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर वसंत भोयेही निवृत्त होणार असून, विजय गोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या विभागात अधिकाऱ्यांची कमी वाढण्याची शक्यता आहे.
या बैठकीत नगरसेवकांनी अतिरिक्त पदभारामुळे निर्णय प्रक्रियेवर आणि विकासकामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
कर्मचाऱ्यांची मोठ्याप्रमाणावर कमतरता
महापालिकेतील ५,२०४ मंजूर पदांपैकी २,२७३ पदे रिक्त आहेत. म्हणजेच जवळपास ४४ टक्के पदांवर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. याशिवाय दरमहा २० ते २५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने प्रशासनातील मनुष्यबळाचा तुटवडा आणखी वाढत आहे.