छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ओढत नेले आणि भावासमोरच चाकूने भोसकून त्याचा निघृण खून केला. विद्यापीठ गेटजवळील जयसिंगपुरा- आम्रपालीनगर भागात सोमवारी (दि. १५) रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एका आरोपीला नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
सुमित काशिनाथ जावळे (१७, रा. खाम नदीच्या काठावर, विद्यापीठ गेटसमोर (आम्रपालीनगर) असे मृताचे नाव आहे. ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण, जिता टाक, अग्री चव्हाण, पूनम विजय चव्हाण (सर्व रा. पहाडसिंगपुरा) या चौघांसह दोन अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
मृत सुमितचे वडील काशिनाथ सुदाम जावळे (४५, रा. आम्रपालीनगर) हे फिर्यादी असून मनपात सफाई कामगार आहेत. त्यानुसार, सुमितचे दीड महिन्यापूवी घाटी क्वॉर्टर परिसरात क्रिकेट खेळण्यावरून ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण आणि जिता टाक यांच्यासह एक अल्पवयीन मुलासोबत वाद झाला होता. या आरोपींनी सुमितला मारहाण करून जखमी केले होते. त्याबाबत सुमितने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल आहे.
१४ ऑक्टोबरला रात्री ११ वाजेपर्यंत सुमित घरी न आल्यामुळे वडील काशिनाथ जावळे यांनी दुसरा मुलगा रितेशला त्यास शोधून आणण्यासाठी पाठविले. तो बाहेर गेला असता काकडे यांच्या घराजवळ खाम नदीच्या काठावर बसून राजेश काकडेसोबत मोबाईल पाहात बसलेला दिसला. तेव्हाच आरोपी ऋतिक, जिता, त्रयी आणि जानूसह एक अल्पवयीन, असे पाच जण आले. त्यांनी सुमितसह राजेश काकडेला घेरले. सुमितला तेरा बहोत हो गया, तुने हमारे खिलाफ पोलिस केस क्यू किया, असे म्हणून त्याला बळजबरी ओढायला लागले.
रितेश, राजेश काकडे यांनी विरोध केला मात्र आरोपींनी सुमितला ब्लुमिंग बर्ड्स शाळेच्या गल्लीत ओढत नेले. तेथे लाकडी दांड्याने मारहाण सुरू केली. त्याचवेळी ऋतिक आणि एका अल्पवयीन आरोपीने चाकू सुमितच्या गळ्याजवळ खुपसला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तेवढ्यात हा प्रकार राजेश काकडे याने पळत जाऊन सुमिच्या वडिलांना सांगितला, ते घटनास्थळी धावले. तोपर्यंत गल्लीतील लोकही मदतीला आल्याने आरोपी पळून गेले. एका दुचाकीवरून सुमितला घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
घटना घडल्यानंतर सर्वच आरोपी पसार झाले. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप, सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांच्यासह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी धावली. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्याचवेळी सोशल मीडियावर माहिती घेतली असता यातील काही आरोपीच्या इन्स्टाग्राम खात्यावर शत्र असलेले आणि भाईगिरी करणारे स्टेट्स ठेवल्याचे आढळले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकला जाऊन आरोपी ऋतिकला बेड्या ठोकल्या.
मृत सुमितच्या एका मित्राची आरोपींची नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत ओळख आहे. त्यामुळे आरोपीमध्ये त्याच्याबद्दल रोष आहे. ते त्याला शोधून मारण्यासाठीच त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो घरी नव्हता. तो सुमितसोबत असेल, असे समजून आरोपी त्याच्याकडे आले असता तेथेही त्याचा मित्र नव्हता. त्यामुळे आरोपींनी सुमितलाच गाठले आणि एकदाचे संपविले, असे सूत्रांनी सांगितले.