

Maratha Reservation: The health of hunger striker Date Patil deteriorated
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसह आदी मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा बुधवारी (दि. १९) अकरावा दिवस होता. सलग उपोषणामुळे दाते पाटील यांची प्रकृती खालावली असून अशक्तपणा वाढला आहे. शुगरची पातळी कमी झाल्याने त्यांना उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका दाते पाटील यांनी घेतली आहे.
दाते पाटील यांच्या प्रकृतीकडे सरकार आणि प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. उपोषणाला अकरावा दिवस उलटूनही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची पुरेशी दखल घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी दिवसभर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दाते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने मराठा समाजातही चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाटील यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला.
यावेळी प्रा. माणिकराव शिंदे, बापुसाहेब शिरसाठ, योगेश शेळके, गणेश उगले, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, संदीप पाटील, निखील काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत.
पाणी सोडण्याच्या इशाऱ्यानंतरही उपोषणाकडे दुर्लक्ष
दरम्यान, मागण्यांबाबत सरकारने येत्या दोन-तीन दिवसांत जीआर काढला नाही, तर अँजिओप्लास्टीनंतर सुरू असलेली नियमित औषधे बंद करण्यासोबतच पाणी पिणेही बंद करणार असल्याचा इशारा दाते पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिला होता. या इशाऱ्यानंतरही सरकार आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दाते पाटलांच्या प्रमुख मागण्या
मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता ओबीसी वर्गाला मिळणाऱ्या सर्व सवलती द्याव्यात.
हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत भूमिका स्पष्ट करावी.
एसईबीसीला ओबीसीप्रमाणे सुविधा द्याव्यात.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत.
सारथी संस्थेला पाच हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा.
स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटी रुपये द्यावेत.
प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात.
कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक