

पैठण : नाशिक परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुती मुर्तीवरून गोदावरीचे पाणी वाहत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुरू असलेल्या ८८ हजार ९३५ क्युसेक्स विसर्गापैकी सुमारे ५१ हजार क्युसेक्स पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारी सकाळी दाखल झाले.
आज शुक्रवारी (दि.24) धरणाची पाणीपातळी ३२.८० टक्क्यांवर पोहोचली असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली. पैठण तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं अल्प प्रमाण आहे. अद्यापही मुसळधार पाऊस धरण परिसरात झालेला नाही. मात्र जायकवाडी धरणात पाण्याची आवक अद्याप सुरू असल्याने आगामी काळात धरणाच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. धरणातील वाढत्या जलसाठ्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह, औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.