

छत्रपती संभाजीनगर : शुभम चव्हाण
चहाची तल्लफ नसते, तल्लफिला चहा पाहिजे. या म्हणीप्रमाणे आजघडीला मित्राची भेट आणि सोबत चहा जणू एक समीकरण बनल आहे. विशेषतः तरुणवर्गात चहा फक्त एक गरम पेय नसून त्याची गोडी मैत्रीच्या जोडीला घट्ट करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
२१ मे हा जागतिक चहा दिवस साजरा करण्यात येत असला तरी, भारतात मात्र चहाचा ऐतिहासिक सबंध आहे. सोळाव्या शतकात ब्रिटिशांनी भारतात चहा आणला. त्यावेळी कुणी चहाचा विषय काढला तरी, इंग्रजांच्या सैनिकात भरती झाला काय? असे बोलले जायचे. आज मात्र सकाळच्या चहाने दिवसाची सुरुवात करणारे लोक ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गप्पा मारताना चहा पिणारे लोक, असा सर्वासाधारणपणे चहाचा दिवसभराचा प्रवास सुरू असतो.
दरम्यान मागील काही वर्षात, गल्लोगल्ली चहाची दुकाने उघडली आहेत. मात्र एवढी संख्या असूनही कुठल्याच दुकानावर ग्राहकांची संख्या कमी दिसत नाही. याचे प्रमुख कारण तरुणवर्गाचा चहाकडे वाढता आहे. नवीन ठिकणी चहा पिणे जणू आज तरुणपिढीची आजची 'फॅशन' बनली आहे. दरम्यान याच संधीचा फायदा घेत अनेकांनी चहा विक्रीचा व्ययसाय सुरू केला आहे. एवढेच नाही तर, व्यवसायातून पैसा, प्रसिद्धी मिळवल्याचे शेकडो उदाहरणे बघायला मिळतात.
आज राज्यभरात चहा आपुलकीचा, 'ती' चहा, चहाप्रेमी, चहासाठी काय पण, कट्टर चहाप्रेमी, चाय बोले तो दिल की बात, मी 'ती' आणि चहा, अन्न, वस्त्र, निवारा व चहा असे विविध मजकूर लिहलेले टी शर्ट घातलेले अनेक तरुण शहरात फिरताना दिसतात.