

पैठण : पैठण तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसायावर होत आहे. दरम्यान वाढत्या तापमानाचा फटका बसत असल्याने पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे.
पैठण तालुक्यात बिडकीन, चितेगाव, हिरडपुरी, दक्षिण जायकवाडी या परिसरात कोंबड्यांचे पोल्ट्रीफॉर्म मोठ्या प्रमाणात आहेत. यंदा एप्रिल महिना सुरू होताच तापमानात कमालीची वाढ होत आहे. असह्य अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे. अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
त्यांचा बचाव करण्यासाठी उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी शेडवर उसाचे पाचट टाकून त्यावर स्प्रिंकलर जोडण्यात आला आहे. व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये फॉगर, स्प्रिंकलर, फॅन, बारदान पोती, पत्र्याच्या शेडवर उसाची पाचट टाकून त्यावर पाणी मारणे, त्यावर स्प्रिंकलर जोडून गारवा निर्माण करणे अशा उपाययोजना करत आहेत. एवढे करूनही कोंबड्यांचे वजनही घटत आहे. सध्या काही ठिकाणी प्रचंड ऊन, उष्णता जाणवत आहे. उष्णघाताने कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे तालुक्यात असलेल्या अनेक पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
पिल्लांना उष्णतेची झळ
तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. कोंबड्या उष्णतेने कमी खाद्य खातात. परिणामी, वजन कमी भरत आहे. पोल्ट्रीतील पिल्लांना उष्णतेची झळ सहन होत नाही. चालू वर्षी - एप्रिल महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागले. त्यामुळे दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते आहे. सोबतच अंडी उत्पादनातही घट झाल्याचे पैठण तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक सांगत आहे.