

How to find names in the voter list?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यात मतदारयाद्यांमधील दुबार नावांचा विषय ऐरणीवर आहे. मतदारयाद्यांमध्ये हजारो व्यक्तींची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी समाविष्ट असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, अशी दुबार नावे शोधण्याचे मेकॅनिझम जिल्हास्तरावर उपलब्धच नसल्याची बाब समोर आली आहे. निवडणूक आयोगाच वेळोवेळी दुबार नावाचा शोध घेऊन वेळोवेळी त्या नावांच्या याद्या जिल्हा प्रशासनाकडे पाठविते, त्यानंतर ही नावे वगळण्याची प्रक्रिया राबविली जाते.
निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीसाठी मतदारयाद्या सुधारित करण्याची मोहीम राबविली जाते. यात नवमतदारांची नावे समाविष्ट करणे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच स्थलांतरीत झालेल्या लोकांची नावे ते राहतात त्या शहरात समाविष्ट करणे आदी कामे याअंतर्गत केली जातात. मात्र, बहुसंख्य ठिकाणच्या मतदारयाद्यांमध्ये काही व्यक्तींची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी असल्याचे आरोप होत आहेत.
आयोगाने काही वर्षांपूर्वी अॉनलाईन पद्धतीने दुबार नावे शोधण्याचे मेकॅनिझम विकसित केले. परंतु त्याचा अॅक्सेस केवळ निवडणूक आयोगाकडेच आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्हास्तरीय यंत्रणेला हा अॅक्सेस दिलेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर मतदारयाद्यांमधील दुबार नावे शोधायची झाल्यास ती मतदारयाद्यांची पाने चाळूनच तपासावी लागतात. तक्रार आल्यास अशा पद्धतीने तपासणी केली जाते. यासोबतच निवडणूक आयोगाकडूनही अधूनमधून दुबार नावांच्या याद्या जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्या जातात. त्यानंतर सारखी नावे असलेल्या या दोन्ही ठिकाणच्या व्यक्ती एकच आहेत कि वेगवेळ्या याचा शोध बीएलओंच्या माध्यमातून घेतला जातो. दोन्ही ठिकाणची व्यक्ती एकच असेल तर तिच्याकडून कोणत्याही एका ठिकाणचे नाव वगळण्याबाबत अर्ज घेऊन हे नाव वगळण्यात येते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात मतदारयांद्यांमध्ये तब्बल ८९ हजार जणांची नावे दुबार नोंदविली गेल्याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ७० हजार नावांची पडताळणी करण्यात आली. त्यात ५ हजार २ नावे दोन ठिकाणी असल्याचे आढळून आले. यापैकी ४४७५ नावे वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, संघटना आणि व्यक्तींकडून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात दुबार मतदार नोंदणीच्या तब्बल १४ तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या.
या सर्व तक्रारींनुसार एकूण ८९ हजार ९८५ नावे दुबार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत यापैकी ७० हजार ९३० मतदारांची पडताळणी केली. या पडताळणीत प्रत्यक्षात ५००२ नावे दुबार असल्याचे आढळून आले. यातील ४७२२ मतदारांकडून नमूना ७अर्ज भरून घेण्यात आला त्यानंतर ४४७५ मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.