

छत्रपती संभाजीनगर ः पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट छत्रपती संभाजीनगरातील उद्योगांना बसू लागले असून, येथील औद्योगिक क्षेत्रावर मोठे संकट ओढावले आहे. युद्धातून निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे गेल्या पाच दिवसांत उद्योगनगरीतील तब्बल 45 कंपन्यांना त्यांचे उत्पादन बंद करावे लागले आहे. गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95 टक्के उद्योग सध्या आपत्कालीन गॅससाठ्यावर (इमर्जन्सी स्टॉक) सुरू असून, त्यांच्यावरही केव्हाही टाळे ठोकण्याची वेळ येऊ शकते. यामुळे उद्योजक प्रचंड चिंतेत आहेत.
मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एलएनजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा मोठा फटका वाळूज, शेंद्रा, बिडकीन आणि चिकलठाणा या औद्योगिक परिसरातील सुमारे 4,500 लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना बसला आहे. विशेषतः, पावडर कोटिंग, ऑटो इंडस्ट्री, स्टील आणि फार्मा कंपन्यांना गॅसटंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. या उद्योगांवर सुमारे दोन लाख लोकांचा रोजगार अवलंबून असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
95 टक्के कंपन्या ऑक्सिजनवर
गॅसपुरवठ्यातील अडचणींमुळे 90 ते 95 टक्के उद्योगांवर परिणाम जाणवत आहे. गॅसअभावी या कंपन्या सध्या केवळ आपत्कालीन साठ्यावर काम करत आहेत. बीपीसीएलच्या पाईपद्वारे गॅसपुरवठा पूर्ववत होण्यास किती दिवस लागतील, हे सध्या सांगता येत नाही.