

Focus on clearing misconceptions about smart meters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांत स्मार्ट मीटर बाबत मोठ्या प्रमाणांत गैरसमज परसरला आहे. तो दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्याच्या कामाला वेग देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता मनिष ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात सध्या ३ लाख ६२ हजार २७ ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख १५ हजार २ ९५ ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. उर्वरित २ लाख ७३२ ग्राहकांकडेही टप्प्याटप्प्याने हे मीटर बसवले जाणार आहेत. नागरिकांच्या मनात मीटर बाबत गैरसमज पसरला असल्याने नागरी भागात अपेक्षित वेगाने काम होत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान या मीटरमुळे ग्राहकांना वीज | वापरावर अधिक नियंत्रण मिळते. अचूक (अॅक्यूरेट) बिलिंग होते, त्यामुळे चुकीच्या बिलांची समस्या कमी होते आणि वीजचोरीसारख्या गैरप्रकारांनाही आळा बसतो.
स्मार्ट मीटर बाबत जिल्हा मागे
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ९० टक्के टीओडी मीटर बसवले गेले आहेत, तर आपल्या शहरात केवळ ३२ टक्केच मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे बिल वाढते किंवा नियंत्रण राहत नाही, हा समज चुकीचा आहे. असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन हे मीटर बसवून घ्यावेत, असे आवाहन केले.
येत्या काळात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांचे गैरसमज दूर केले जाणार असून, सर्वच ग्राहकांना लवकरच स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले