

हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूर येथील शिवना नदी जवळील असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून “पाच टन” मासे मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
मंगेश ढोबळे यांच्या शेतात ४०० बाय ३०० चे शेततळे आहे. शेततळ्यात अमोल बिरुटे यांनी १० महिन्यांपूर्वी कोंबडा, काथला, राहू, मिरगर्ल, ग्रापसर्प, मिरल, वाम, असे ४० हजार मत्स्यबीज सोडले होते. त्यातील मासे आता मोठे झाले होते. परंतु वेळी अज्ञाताने त्यांच्या शेततळ्यात विषारी औषध टाकल्यामुळे पाच टनाहुन अधिक माशांचा यामध्ये मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे मोठे नुकसान झाले आहे.