

Fish seeding begins in ponds
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे काही पाझर तलावांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झालेल्या मत्स्यव्यवसायिकांनी तलावांत मत्स्यबीज सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र पावसाने पुन्हा दांडी मारल्यास सोडलेले मत्स्यबीज वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
परिस्थितीत पावसाळा सुरू होऊन महिनाभर उलटूनही अनेक धरणे व तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्यव्यवसायिकांनीही उपलब्ध पाण्यात मत्स्यबीज सोडण्यास सुरुवात केली आहे.
अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्थेचे युवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत लाडे यांनी शासनाने गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायिकांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाला असला तरी मत्स्य व्यावसायिक आजही विविध अडचणींना तोंड देत आहेत. समुद्रातील मत्स्य व्यवसायासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र गोड्या पाण्यातील मत्स्य व्यावसायिकांना अपेक्षित मदत मिळत नाही.
शासनाने मत्स्य व्यावसायिकांना मासेमारीची जाळी व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून व्यवसायाला चालना द्यावी. तसेच मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी चंद्रकांत लाडे यांनी केली. यावेळी कैलास लाडे, कुसुम तेल येथील मच्छिंद्र भुतांबरे, कचरू भुतांबरे, सखाराम भुतांबरे, गोरख भुतांबरे, कवरचंद मेंगाळ, राजेंद्र मेंगाळ तसेच निरगुडी येथील सुरेश ठाकर, शिवनाथ ठाकर, चेतन वायडे आदी उपस्थित होते.