

Farmers' Sit-in Protest in Soygaon Tehsil
जरंडी, पुढारी वृत्तसेवा सोयगाव तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या व वाहून गेलेल्या सहा गावांतील खरडून गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीच्या स्वाक्षऱ्या न घेताच दाखल झाल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांनी शेतकऱ्यांसह सोयगाव तहसील कार्यालयात दुपारी दोन तास ठिय्या मांडला. या संदर्भात गुरुवारी (दि.१६) संयुक्त बैठक होणार आहे.
सोयगाव तालुक्यातील निमखेडी, बोरमाळ तांडा, तिडका, नांदगाव, नांदगाव तांडा व घोसला येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे न करता संबंधितांनी कृषी, पंचायत समिती या त्रिस्तरीय समितीच्या स्वाक्षऱ्या न घेताच दाखल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
शेत जमिनी वाहून गेलेले पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असून त्रिसदस्यीय समितीशिवाय अपूर्ण व बोगस पंचनामे दाखल केल्याचा आरोप भगवान पवार या शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांनी केला होता.
या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद सद्स्य पुष्पाताई काळे यांनी तहसील कार्यालय येथे भेट देऊन शेतकऱ्यांसोबत दोन तास ठिय्या मांडला. नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांच्याशी संवाद साधून त्यांनी संबंधित पंचनामे संचिका तपासणी केली असता, शेतकऱ्यांनी केलेले आरोप प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. पुष्पा काळे यांनी प्रशासनाला सूचना देत गुरुवारी (दि.१६) संबंधित तलाठी, कर्मचारी, तहसीलदार आणि बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बोलावण्याचे निर्देश दिले.