

Farmers in the Kadethan area are in distress due to the lack of rainfall
कडेठाण, पुढारी वृत्तसेवा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटून गेले असतानाही परिसरात अद्याप समाधानकारक व दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी, नाले व तलाव कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून पिकांवर विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
यंदा पाऊस चांगला होईल आणि खरीप हंगाम बहरून येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधांसह मशागतीचा खर्च भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतले, तर काहींनी खासगी सावकारांकडून पैसे घेतले. काही शेतकऱ्यांनी घरातील सोन्या-नाण्यांवरही तडजोड करून शेतीत पैसा गुंतविला. काळ्या आईची ओटी भरून यंदा तरी चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती.
पिके जोमाने वाढतील आणि उत्पादन चांगले मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतात जीवापाड मेहनत घेतली. चांगले उत्पन्न मिळाल्यास मुलीचे लग्न करायचे, मुलांना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी पाठवायचे, घराची दुरुस्ती करायची, तसेच घेतलेले कर्ज फेडायचे, अशी अनेक स्वप्ने शेतकऱ्यांनी पाहिली होती.
कडेठाण परिसरातील अनेक शेतांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आदी खरीप पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत. जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यातच किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या खर्चाचा आणखी बोजा पडत आहे.
फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान पावसाळ्याच्या उर्वरित काळातही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास परिसरातील फळबागा जगविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. फळबागांसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने उपलब्ध पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शेतीचे अर्थचक्र विस्कळीत
पावसाअभावी शेतीचे अर्थचक्रच विस्कळीत होण्याची शक्यता असून शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.