

Farmer dies from electric shock.
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा एका शेतक-याने रानडुकर पिके वाचविण्यासाठी अवैध पध्दतीने तारांमध्ये वीज प्रवाह सोडला होता. शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा या वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि.४) रात्री लाखेगाव (ता. पैठण) येथे ही घटना घडली.
जमील उमर शेख (२८, रा. लाखेगाव, ता. पैठण) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तरुणाच्या शेजारील एका शेतकऱ्याने रानडुकरांनी शेतातील पिकांची नासाडी करू नये यासाठी शेतबांधावर तारांमध्ये वीज प्रवाह सोडला होता.
शेतकरी जमील उमर शेखहा नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी निघाले होते. शेतबांधावर सोडलेला वीज प्रवाह असलेली तार शेतातील पाण्यात पडली होती. शेतात गेल्यावर मोटार सुरू करताच जमील यांना जोराचा शॉक बसला यात त्यांचा मृत्यू झाला. पहाटे घरी न आल्याने घरच्यांनी मोबाईलवर कॉल केला, परंतु प्रतिसाद येत नसल्याने घरातील सदस्य शेतात गेले.
तेथे गेल्यावर ते शेतात पडल्याचे दिसले. जमील उमर शेख यांना नातेवाईकांनी रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. जमील उमर शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन अपत्ये आहेत. घटनेची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली. पो. उप. नि. झीजुर्डे. उबाळे, सह पो. हे. कॉ. आजीनाथ शेकडे यांनी पंचनामा केला. पोलिसांनी संशयावरून एका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स. पो. नि. नीलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. उबाळे व जमादार शेकडे हे करीत आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळेऐवजी दिवसा वीज पुरवठा शेतीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी अनेकदा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी नेहमीच दुर्घटनेची वा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भिती असते. पीकांसाठी शेतकऱ्यांना शेतात रात्रीच्या वेळी जावेच लागते. वीज महामंडळाने याकडे लक्ष देण्याची आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.