

गंगापूर : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका दारूड्याने अपघातात जखमी झालेल्या जिवलग मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधून फरपटत नेत कसाबखेड्याजवळ एका खड्ड्यात फेकून दिले. यामध्ये जखमी मित्राचा तडफडून मृत्यू झाला. दारूड्या मित्राविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत किसन नायमाने असे मृत्यू झालेल्याचे नाव असून सागर भाऊसिंग जारवाल असे संशयित दारूड्याचे नाव आहे. दोघेही मंबापूर येथील आहेत.
रणजीत आणि सागर हे दोघे मित्र होते. सागरने काही दिवसांपूर्वी रणजीतला स्वतःच्या नावावर हप्त्याने नवीन मोबाइल घेऊन दिला होता. त्याचे हप्ते रणजीत भरत होता. कालांतराने मोबाइलचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने सागरकडे तगादा लावला. सागरने रणजीतकडे पैसे मागायला सुरुवात केली होती.
२१ फेब्रुवारीला दोघे फतियाबाद येथील एका हॉटेलवर दुचाकीने आले होते. तेथे दोघेही दारू प्यायले. त्यानंतर ते दारूच्या नशेत दुचाकीने धुळे-सोलापूर हायवेने निघाले. सागरने दुचाकी भरधाव चालविल्याने चित्तेपिंपळगाव येथे त्यांचा झाला यामध्ये रणजीत गंभीर जखमी झाला. त्यानंतर सागरने त्याला दवाखान्यात नेण्याची गरज असताना दुचाकीला बांधले आणि रात्री ११:३० वाजता कसाबखेड्याजवळ फरपटत आणले. यामुळे रणजीतच्या उजव्या पायाची पाचही बोटे तुटली. त्यानंतर सागरने त्याला एका खड्ड्यात फेकून दिले. यात रणजीतचा तडफडून मृत्यू झाला. हा गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने प्रकरण चिकलठाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.