छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे, तरीही आजच्या घडीला शिक्षणासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. ही एकप्रकारे सरकारकडून धूळफेक असल्याचा दावा मराठा समाजातून केला जात आहे. उच्च शिक्षणासाठी वर्षाकाठी किमान दोन ते पाच लाख रुपये मोजावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनयात्रा संपविण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ४७ हजार १६८ जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून यात सर्वाधिक जात प्रमाणपत्रांचे बीड जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत १३ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये एकट्या छत्रपती संभाजीनगरातील १२ जणांचा समावेश आहे तर जालन्यातील एकाचा समावेश आहे. आरक्षणासाठी आपली जीवनयात्रा संपविलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत शासनाकडून दिली जात आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला राज्य शासनाने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे. आरक्षण देण्यात आले असले तरी, त्याचा शिक्षणासाठी कोणताही फायदा होत नसल्याचे मत मराठा समाजाने व्यक्त केले आहे. तर सरकारने आरक्षण दिल्याचा फायदा घ्यावा, या आरक्षणाचे फायदे समजून घ्यावेत, असेही मत व्यक्त होत आहे. दरम्यान, २७ जून रोजी लाडसावंगीतील बाबासाहेब जनार्दन पडूळ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत असल्याची चिठ्ठी लिहून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळाल्या आहेत. आता आपली जीवनयात्रा संपवू नका, आरक्षणाचे मुद्दे समजून घ्या, असे मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांचे म्हणणे आहे. तर जातप्रमाणपत्रासाठी केवळ ५७ रुपये द्यावे लागत असल्याचे सेतू सुविधा केंद्राचे म्हणणे आहे.
जिल्हा व प्रमाणपत्र संख्या
संभाजीनगर : ११ हजार ४३३
जालना : १० हजार २१०
परभणी ९ हजार ४९९
हिंगोली ५ हजार ३८१
नांदेड २ हजार ९१५
बीड ९६ हजार १३७
लातूर १ हजार ७६६
धाराशिव ९ हजार ८२७