

Departure of Dindi of Shri Vitthal Ashram towards Pandharpur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल आश्रमाच्या वतीने संस्थान प्रमुख गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४४ वर्षांपासून अखंड परंपरेने सुरू असलेल्या पंढरपूर दिंडीचे यंदा बुधवारी (दि.१८) सकाळी नामदेव-तुकारामाच्या गजरात दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
श्री क्षेत्र विठ्ठल आश्रम जाखमाथा येथील पायी दिंडीने सकाळी सात वाजता प्रस्थान केले. या दिंडीत हजाराच्या वर महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. दिंडीचे शहरात सकाळी स्वागत करण्यात आले. यावेळी सडा रांगोळी फटाके फोडून व विठ्ठल नामस्मरणाचे घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजीव गांधी चौक, खंडोबा वेस, मार्गे दिंडीने राजमाता अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ गेल्यावर धनगर समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने मेंढ्यांचे रिंगण करत दिंडीचे स्वागत केले. विठ्ठल नामदेव -तुकारामफ्च्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे धनगर समाज बांधवांनी काठी व घोंगडं देऊन स्वागत केले.
दिंडी श्रीक्षेत्र नेवासा येथे पोहोचेल व नेवासा येथून आणखी चाळीस दिंड्या एक सोबत पंढरपूरकडे प्रस्थान करतील. यावर्षीपासून हा नवीन पायंडा पडला आहे. १७-१८ दिवसांच्या पायी प्रवासात वारकऱ्यांची ठिकठिकाणी भोजनाची व्यवस्था तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या दिंडीच्या समवेत पाण्याचे टँकर, औषधी, दुधाचे टँकर तसेच शिधा यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी नगराध्यक्ष संजय जाधव, माजी नगरसेवक अविनाश पाटील भाग्येश गंगवाल, अमोल जगताप, अभिषेक ठोंबरे, कालीदास पवार, बाबासाहेब गायके, संदीप साबणे, कैलास साबणे, सुधाकर साबणे, गिरीश गंगापूरकर प्रभाकर साबणे, विशाल साबणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गंगापूर येथे मेंढ्यांचा रिंगण सोहळा पारंपरिक रूपात साजरा करण्यात आला. पांढऱ्याशुभ्र मेंढ्या दिंडीभोवती विशिष्ट पद्धतीने गोलाकार फिरत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्याच्या यशस्वितेसाठी रावसाहेब तोगे, उद्धव तोगे, अरुण रोडगे, गोरख काळे, बापू पोकळे, पृथ्वीराज तोगे, अनिल घोडके, नारायण काळे, बबन काळे, नवनाथ काळे, सुभाष काळे यांच्यासह समाज बांधवांनी मोठे योगदान दिले.