

वरठाण : खरिपासह रब्बीच्या पिकांसाठी, तसेच म्हैशींसाठी घेतलेले कर्ज फेडण्याच्या चिंतेमुळें शुक्रवारी (ता. १४) पहाटे विषारी किटकनाशक प्राशन करून बनोटी (ता.सोयगांव) येथील तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले. राजू शेनपडू जाधव (वय ४२)असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
अल्पभूधारक शेतकरी असल्याने जाधव हे गावाजवळील शेती बटाईने करीत होते. उत्पादन आणि उत्पादन खर्चाचे गणित जुळत नसल्याने शेतीसाठी सेवा संस्थेचे तसेच खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन घरसंसार चालवित असताना कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. त्यात त्यांनी रब्बीच्या मक्याची लागवड केली आहे. परंतु सध्या शेती वीज पंपाची या भागात मोठी समस्या भेडसावत असून रब्बीचे मका पिके सुकत आहे. त्यामुळे शेतीवर काढलेल्या सोसायटीच्या कर्जासह इतर खासगी कर्ज फेडण्याची चिंता, पिकांची बिकट स्थिती पाहून कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती. शुक्रवारी सकाळी लवकर उठून म्हैशीचे दुध काढून येतो असे ते सांगून गेले होते. घरी परतले नसल्याने मुलगा दिपक शेतात गेला असता वडील जमिनीवर पडलेले दिसून आले. त्यांना बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
याबाबत बनोटी दुरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, श्रीकांत तळेगावकर करीत आहेत.