Dams in Marathwada have reached their lowest point
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यातच आता मान्सूनबाबत आधी वर्तविलेला अंदाज चुकला असून, मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्य:स्थितीत मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्व ९२९ प्रकल्पांमध्ये सरासरी ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही लघु प्रकल्पांची अवस्था आणखीनच बिकट आहे.
मराठवाडा हा कमी पावसाचा प्रदेश आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. गतवर्षी मराठवाड्यात दमदार पाऊस झाला. बहुसंख्य महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. या अतिपावसामुळे विभागातील लहान मोठी धरणे तुडुंब भरली होती. गेल्या सहा महिन्यांत धरणांमधून शेतीच्या सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. आता उन्हाळ्याच्या शेवटी मात्र बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे.
जायकवाडीत ३५ टक्के साठा
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात सध्या ३५ टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात २४ टक्के, मांजरा धरणात २२ टक्के, हिंगोलीतील येलदरीत ५१ टक्के, नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणात ४५ टक्के, विष्णुपुरीत ५० टक्के, धाराशीवच्या सिना कोळेगाव धरणात टक्के व परभणीतील निम्न दुधना प्रकल्पात ३३ टक्के जलसाठा आहे