

छत्रपती संभाजीनगर : लडाखचे ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध घटनात्मक आणि लोकहिताच्या मागण्यांसाठी सुरू केले. आमरण उपोषणादरम्यान पोलिसांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलविल्यानंतर देशभरातील विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांच्या पुढाकाराने हे आंदोलन होत असून ते दुपारी १२ ते ३ या वेळेत सुरू राहणार आहे.
आंदोलनात संशोधक, विद्यार्थी, शिक्षक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या", "शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", "इंकलाब जिंदाबाद", "जय भीम", "लढेंगे, जितेंगे" तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी संपूर्ण क्रांती चौक परिसर दणाणून गेला.
यावेळी महापुरुषांच्या इतिहासावर आधारित पोवाडे, देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे पथनाट्य, रॅप तसेच शासनाच्या धोरणांवर टीका करणारी गीते सादर करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडत सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी केली. आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असून विविध सांस्कृतिक माध्यमांतून निषेध नोंदविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या हातात झळकले विविध संदेशांचे फलक
आंदोलनकर्त्यांच्या हातात "आय सपोर्ट सोनम सर", "आय ॲम कॉकरोच", "संविधान जिंदाबाद", "देशासाठी शिक्षण आणि लोकशाही महत्त्वाची", "दादागिरी नाही चालणार", "हुकूमशाही नाही चालणार", "शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या" अशा आशयाचे शेकडो फलक होते. अनेकांच्या हातात तिरंगा ध्वजही झळकत होता.
आंदोलनात सहभागी संघटना
संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य, मराठवाडा शिवप्रेमी वकील मित्र संयोजन समिती तसेच विविध विद्यार्थी, सामाजिक आणि वकील संघटनांचा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा होता.
पोवाडे, पथनाट्य आणि रॅपने वेधले लक्ष
पोवाडे, पथनाट्य, रॅप आणि जनजागृतीपर गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकशाही, संविधान आणि शिक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. घोषणाबाजी, तिरंगा ध्वज आणि विविध संदेशांचे फलक यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.